स्वच्छ गाव, सुंदर शहर ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

0

राज्यातील स्वच्छतेच्या महाश्रमदानाची सुरुवात पाळधी गावातून

जळगाव, दि.१ :- पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक व सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छतेत लोकसहभागाचा महत्त्वाचा वाटा आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी “स्वच्छता ही सेवा” अभियान वरदान ठरणार असून त्यासाठी सांघिक प्रयत्न गरजेचे आहे. स्वच्छता हीच ईश्वरीय सेवा मानून स्वच्छ गाव, सुंदर शहर ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी समाजाप्रती आपले निरंतर कर्तव्य पार पाडावे. असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले. राज्यातील स्वच्छतेच्या महाश्रमदानाच्या कार्यक्रमाची सुरुवात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वग्राम पाळधी येथून झाली. त्यावेळी ते बोलत होते. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता ही सेवा या थीमवर आधारित “कचरामुक्त भारत” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंधरवडयानिमित्त पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. त्यांचाच एक भाग म्हणून ” ०१ तारिख, १० वाजता, एक तास” १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता पाळधी येथे स्वच्छतेच्या महाश्रमदानाकरिता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी नोंदवला. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. गावातील सर्व शाळा, आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन, अंगणवाड्या . शासकीय कार्यालये व विविध भागात स्वच्छता करण्यासाठी श्रमदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका ज्योती पाटील यांनी केले तर प्रास्ताविकात स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भरत कोसोदे यांनी जिल्ह्यात स्वच्छता बाबत पंधरवाड्यात राबविलेले विविध उपक्रमा बाबतची माहिती विषद केली. आभार केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे व ग्रामविकास अधिकारी दिपक पाठक यांनी मानले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच लक्ष्मी शरद कोळी, प्रकाश पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भरत कोसोदे, पोलीस निरीक्षक सचिन शिरसाट, विस्तार अधिकारी उपस्थित होते.